नारायण
सुर्वे हे मराठीतील पहिले आणि शेवटचे कामगार कवी म्हणून ओळखले जातात. मुंबईतील
कापड गिरण्या, तेथील कामगार, त्यांचे खडतर जीवन, महानगरातील दारिद्र्य, विषमता यांना त्यांच्या कवितेत महत्त्वाचे स्थान
होते. कारखानदार आणि सत्ताधारी विरुद्ध कष्टकरी कामगार यांच्यातील वर्गसंघर्ष
त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. कार्ल मार्क्स यांच्या
वर्गसिद्धांताप्रमाणे कला या नेहमी आहे रे (भांडवलशहा आणि सत्ताधारी) वर्गाच्या
धार्जिण्या असतात. त्यांवर नेहमी आहे रे वर्गाच्या विचारांची छाया जाणवत असते.
मराठी साहित्यही याला अपवाद नाही. साहित्याच्या या प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन
शोषितांची, कष्टकऱ्यांची जीवनव्यथा नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेत मांडली. आपल्याला कवितेची
स्फूर्ती कशी मिळाली आणि आपल्या कवितेचे स्वरूप कशाप्रकारचे आहे हे त्यांनी आपल्या
चार शब्द या कवितेत स्पष्ट केले आहे.
नारायण सुर्वे म्हणतात की, आमच्या
रोजी-रोटीचा, दैनंदिन जीवनाच्या संघर्षाचा सवाल नेहमीचाच आहे. आमच्या हातावर आमचे
पोट आहे. कधी कारखान्यात काम मिळते, कधी संप होतो, कामावरून कमी केले जाते, तरीही आम्ही कामगार तळपत्या
तलवारीप्रमाणे तडफदार आहोत. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची आम्हाला जाणीव आहे.
त्याविरुद्ध आम्ही संघर्ष करत आहोत. मात्र आमचे हे जीवन कधीच इथल्या सारस्वतांनी
(साहित्यिकांनी) आपल्या लेखनात चितारले नाही. त्यामुळे साहित्यिकांनो आता मी
तुमच्या आशयविश्वात आम्हा शोषितांची व्यथा मांडून थोडा गुन्हाच करणार आहे असेही ते
उपरोधाने म्हणतात.
आपल्या कवितांच्या आशयात काय आहे हे
सांगताना ते म्हणतात की या जीवनात आम्ही जे सहन केलं, जे पाहिलं, निरीक्षणातून ज्या गोष्टींचे अंदाज
बांधले ते तर माझ्या कवितेत आहेच मात्र त्याच्या जोडीने कष्टकरी वर्ग म्हणून
माझ्या जगाची वेदना आणि स्वेदगंधही त्यात आहे. या खडतर मार्गावर चालताना कधी चुकलो, काही गोष्टी
गमावल्या तर काही नवीन शिकलोही आहे. जसं आयुष्य मी जगलो अगदी तसंच आयुष्य मी
माझ्या कवितेत शब्दबद्ध करणार आहे.
माणसाला जगण्यासाठी अन्न गरजेचे असतेच,
मात्र त्याला अन्नाबरोबरच आत्मसन्मानही हवा असतो याची जाणीवही आता आम्हाला झाली
आहे. त्यामुळेच आता माझं विश्व, माझे कामगार बंधू नव्या जगासाठी, परिवर्तनासाठी सिद्ध होत आहेत. अन्यायापुढे झुकणाऱ्या वृत्तीला, गुलामीला नष्ट
करण्यासाठी आता माझे शब्दच शस्त्रे परजणार आहेत. आमच्यावर युगानुयुगे अन्याय होत
आलेला आहे. मात्र आजवर हा अन्याय आम्ही सहन केला म्हणून तुम्ही बेसावध राहू नका.
ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. त्यापुढे एक भीषण संघर्षाला सुरूवात होणार
असल्याचा संकेत कवी आपल्या कवितेतून देत आहे. अशाप्रकारे चार शब्द हे नारायण
सुर्वे यांची कविता वर्गसंघर्षांमुळे कष्टकऱ्यांच्या शोषणाला अधोरेखित करते आणि
त्याचप्रमाणे त्यांना आलेल्या आत्मभानाची जाणीवही स्पष्ट करते.
नोटच्या PDF साठी खालील दुव्यावर टिचकी द्या.
https://drive.google.com/open?id=1fqGf_x6phY5tt7DTuGWF_N2rMfvxvTod
https://drive.google.com/open?id=1fqGf_x6phY5tt7DTuGWF_N2rMfvxvTod
No comments:
Post a Comment