गो.जो.महाविद्यालयात
प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या दीर्घ कवितासंग्रहाचे प्रकाशन
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांची विचारधारा अधोरेखित करणा-या प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच'
या दीर्घ कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांच्या हस्ते झाले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल मध्ये दिनांक ६ जानेवारी रोजी हा
प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमांतर्गत
या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर
कार्यक्रम अध्यक्षा कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ.कल्पना आठल्ये, प्रसिद्ध कवी अजय
कांडर, ज्येष्ठ कवयित्री नीरजा, ज्येष्ठ कवयित्री प्रा.जयश्री बर्वे, ज्येष्ठ पत्रकार
सचिन परब , वाङ्मयमंडळ व मराठी विभाग प्रमुख प्रा.शिवराज गोपाळे उपस्थित होते. प्रकाशनाचे
औचित्य साधून आयोजित केलेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 'युगानुयुगे
तूच' या कवितासंग्रहाकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सर्व वर्गापर्यंत
पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून आपण पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ कवयित्री
जयश्री बर्वे यांनी केले.कवी अजय कांडर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर
दीर्घ कविता लिहून समाजातल्या सर्व स्तरातल्या वर्गाने समतेच्या विचारावर एकत्र
नांदायला पाहिजे, असे यावेळी उपस्थितांना आवाहन केले. तर जेष्ठ कवयित्री नीरजा
यांनी विचार संपून टाकण्याच्या या काळात 'युगानुयुगे तूच' सारखा दीर्घ कवितेचा
संग्रह प्रसिद्ध होणे म्हणजे बाबासाहेबांच्या 'माणसाकडून माणसाकडे' जाण्याच्या विचाराच
पुनर्जागरणच होय असे चर्चासत्रात प्रतिपादन केले. या कवितासंग्रहाबाबत आपली भूमिका
मांडताना सचिन परब म्हणाले की आजच्या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विचारांची गरज कवी कांडर यांनी अतिशय सोप्या भाषेत मांडली आहे.
प्रकाशन
सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रा.शिवराज गोपाळे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सीमा वीर यांनी केले. या सोहळ्यासाठी उपस्थित
मान्यवरांबरोबर तरुण भारत रत्नागिरी आवृत्तीचे संपादक राजा खानोलकर, आर्ट सर्कलचे
नितीन कानविंदे, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment